हृदयाचे आरोग्य आणि आहार

“The way to a man’s heart passes through his stomach”

अशी एक म्हण इंग्रजीतून आहे. माणसाच्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. म्हणजे एखाद्याला चांगलचुंगलं करून खाऊ घातलं की त्याचं मन जिंकता येतं. पण या म्हणीचा शब्दशः अर्थ घेतला की हृदय विकाराच्या दृष्टीनंही ही म्हण बरोबर ठरते. म्हणजे त्याच्या पोटात योग्य ते अन्नपदार्थ जात असले की हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. हृदयाचं आरोग्य आणि आहार यांचा फार निकटचा संबंध असतो.

आता, योग्य आहार म्हणजे कसा आहार, कोणता आहार असा प्रश्न उभा राहतो. काय खायचं, किती खायचं, काय खायचं नाही हे सगळं लक्षात ठेवून रोज आपल्या आहारावर सारखं लक्ष ठेवायचं का? असं करण्याची गरज नाही. काही ठळक गोष्टी लक्षात ठेवल्या की रोज आहाराचा वेगळा विचार करावा लागत नाही. पुढे दिलेला आहार हा हृदयविकार असणार्‍यांच्या दृष्टीनं योग्य असा आहे पण त्यातल्या अनेक गोष्टी वजन कमी करणे आणि हृदय निरोगी राहण्याच्या दृष्टीनंही उपयोगी आहेत.

1) संपूर्ण शाकाहार ः

 याला अपवाद अंड्यातला पांढरा भाग. अंड्यातला पिवळा बलक हे कोलेस्टेरॉलच असतं त्यामुळे ते खायचं नाही. नवीन संशोधनानुसार आहारातून पोटात जाणार्‍या कोलेस्टेरॉलमुळे शरीरात तयार होणारं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी असतं. पण म्हणून रोज ते खायचं नाही तर एखाद्या वेळेला खायला हरकत नाही.

2) मांसाहार वर्ज्य : 

विशेषतः लाल रंगाचं दिसणारं मांस पूर्णपणे वर्ज्य.

3) कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ आणि संपृक्त स्निग्धांश/मेद वर्ज्य : 

लोणी, तूप, साय, चीज, अंड्यातला पिवळा भाग हे वर्ज्य. तज्ञांच्या मते रोज 5 मि. ग्रा. कोलेस्टेरॉल खायला हरकत नाही. पण हे मोजमाप घरी करणं कठीण असतं म्हणून कोलेस्टेरॉल वर्ज्य करणं आणि अगदी अपवादात्मक वेळी ते थोडं खाणं हे सोयीचं होतं. शिवाय रोज आपण चहा, कॉफी पितो. त्यात दूध असतं आणि दुधात, अगदी स्किमड् दुधातही थोडं कोलेस्टेरॉल असतं.

4) कॅॅफीन वर्ज्य ः

 त्यामुळे कॉफी वर्ज्य. चहाही कमीत कमी दूध घालून किंवा दूध विरहीत. चहा व कॉफीत फ्लॅवेनॉइड्स असतात आणि ती हृदयाच्या दृष्टीनं उपयुक्त असतात. म्हणून थोडी कॉफी व चहा घ्यावा पण त्यात दूध अगदी कमी असावे.

5) तंबाखू ः

 यात विडी, सिगारेट, गुटखा हेही आले. कोकेन, मॅरूआना इ. सर्व पदार्थ वर्ज्य.

6) एकूण आहारात फक्त 10% स्निग्धांश म्हणजेच मेद असावेत.

 हे प्रमाण आहाराच्या वजनाचं नसून त्यातून मिळणार्‍या ऊष्मांकांचं म्हणजे कॅलरीजचं आहे. या मेदापैकी फक्त 1/3 मेद संपृक्त (Saturated fats) व बाकीचे असंपृक्त (Unsaturated fats) असावेत. तूप, लोणी, साय, चीज हे पदार्थ संपृक्त मेद असल्यामुळे ते अत्यंत कमी प्रमाणात किंवा क्वचित वापरावेत.

7) कच्चे पदार्थ जास्त खावे ः

 फळं, मोड आलेली कडधान्यं, भिजवलेल्या डाळी, काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, कोवळी भेंडी यांसारख्या भाज्या आपण खाऊ शकतो.

8) साखर आणि मीठ कमी प्रमाणात.

9) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं काही पदार्थ उपयोगी असतात.

 ते नेहमी वापरात असावेत. उदा. कांदा, लसूण, गाजर, वांगं, सोयाबीन, स्किमड् दुधाचं दही, सफरचंद हे पदार्थ नेहमी खाण्यात असावेत.

10) असंपृक्त मेद पूर्णपणे वर्ज्य करू नयेत. 

सर्व वनस्पती तेलं म्हणजे असंपृक्त मेद असतात. पण सर्व तेलांमध्ये थोड्या प्रमाणात संपृक्त मेदही असतात. म्हणून तेल वापरावं पण अत्यंत कमी प्रमाणात. मात्र ते पूर्ण वर्ज्य करू नये.

11) थोडक्यात म्हणजे ज्यात जीवनसत्वं, प्रथिनं इ. भरपूर असतील अशा विविध धान्यांचा, 

भाज्यांचा आणि फळांचा समावेश असलेला शाकाहार हा हृदयाला योग्य आणि पोषक असतो.

या सगळ्या गोष्टींचा विचार करून रोज किती आणि कसं जेवायचं ते ठरवायचं म्हणजे कठीण आहे असं कदाचित वाटू शकेल. पण तसं करण्याची म्हणजे रोज त्याचा विचार करण्याची गरज नाही. आपल्याला रोज किती आहार लागतो आणि तो आपण किती वेळा वाटून म्हणजे चहा, न्याहारी, दुपारचं जेवण,

संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण असा वाटून खातो याचा विचार करून रोजच्या आहाराचं प्रमाण ठरवावं आणि ते पाळावं. कधीमधी त्याला अपवाद करता येतो.

अत्यंत थोडं तेल वापरायचं म्हणजे तळलेले पदार्थ खायचे नाहीत आणि फोडणीत अत्यंत कमी तेल घालायचं आणि आपल्या भारतीय पद्धतीच्या जेवणात तर तोंडी लावण्याच्या सर्व पदार्थांमध्ये फोडणी असतेच. मग असे अत्यंत कमी तेलाचे पदार्थ सर्वांना कसे आवडतील? घरात अनेक माणसं असतात, त्या सर्वांना असं जेवण आणि तेही रोज कसं आवडेल असा प्रश्न गृहिणीला पडेल. शिवाय अत्यंत कमी म्हणजे किती? आणि मग पदार्थ बेचव होईल त्याचं काय? असं वरवर पाहता वाटेल. पण विचार केल्यावर लक्षात येईल की निर्बंध आहे तो फक्त तेलावर. फोडणीत घालण्याच्या इतर पदार्थांवर काही निर्बंध नाही. आपण फोडणीत घालतो ते पदार्थ म्हणजे मोहरी, जिरे, हिंग, हळद, कडीपत्ता इ. फोडणीसाठी आपण आधी तेल तापवून त्यात मोहरी घालून ती तडतडली की मग जिरे घालून ते तडतडले की मग बाकीचे पदार्थ घालतो. जिरे आणि मोहरी तडतडली की ती फुटते. तळली जाते आणि मग घास खाताना दातांखाली आली तर कच्ची लागत नाही. फोडणीत मोहरी नीट फुटली नाही तर ती कच्ची लागते.

तेल वापरायचं नाही म्हणजे मोहरी आणि जिरेही वर्ज्य करायचं का? तसं करण्याची गरज नाही. तेल घालायचं नसल्यामुळे मोहरी-जिरे कच्चं राहू नये म्हणून ते भाजून घेऊन पदार्थात घालावं म्हणजे ते कच्चं लागत नाही आणि बाकीचे फोडणीचे पदार्थ वरून घालावे. म्हणजे फोडणी घातलेली नाही असं पदार्थाकडे बघून वाटणार नाही. हिंग आणि हळद यांना उग्र वास असतो आणि हळदीला भडक रंग असतो. फोडणीच्या तापलेल्या तेलात घातल्यावर उग्र वास आणि रंगही कमी होतो म्हणून हे पदार्थ कच्चे घालताना नेहमीपेक्षा थोडे कमी घालावे.

रोज भाजी-आमटीत थोडी मोहरी आणि थोडं जिरं घातलं जातं. 1/4 ते 1/2 चमचा. रोज ते भाजत बसण्यापेक्षा एकदम बरंच भाजून ठेवावं आणि रोज थोडं वापरावं. आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये मिसळणीचा डबा असतो, ज्यात नेहमी लागणार्‍या मसाल्यांचे पदार्थ भरून ठेवलेले असतात. भाजलेली मोहरी आणि भाजलेलं जिरं त्या डब्यात भरून ठेवावं म्हणजे रोजच्या वापराला सोयीचं जातं.

अशा प्रकारे भाजी कशी करायची ते आपण पाहू. समजा आपल्याला कांदा-बटाट्याची रसभाजी करायची आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही भाज्या, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे चिरून घ्यावं. पातेलं गॅसवर ठेवून ते तापलं की त्यात कांदा घालून परतावा. तेल घातलेलं नसल्यामुळे तो बुडाला चिकटायची शक्यता आहे. म्हणून तो मधून-मधून हलवत रहावा. तो किंचित लालसर झाला की त्यात चिरलेला बटाटा घालून शिजण्यापुरेसं पाणी घालावं. मग त्यात भाजलेली मोहरी, जिरं, हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता इतर काही मसाले घालायचे असल्यास ते आणि चवीपुरते मीठ घालून ढवळून झाकण ठेवावं. अधून-मधून ढवळत भाजी शिजवावी. भाजी शिजली की आंचेवरून खाली उतरावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

नेहमीचे सर्व पदार्थ भाजीत घातलेले असल्यामुळे आणि मोहरी-जिरंही दिसत असल्यामुळे भाजीचं रंग-रूप नेहमीसारखंच दिसतं. त्यात तेल नाही हे बघणार्‍याच्या लक्षातही येत नाही. या भाजीत पाणी घालून ती करायची असल्यामुळे ती करायला सोपी आहे.

सुग्रास, चविष्ट पदार्थ आपलं पोट तर भरतातच, त्याचबरोबर ते आपलं मनही प्रसन्न करतात. सणासुदीला किंवा एखाद्या विशेष कारणानं झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी आपण मेजवान्या, पार्टीज, सहली आयोजित करतो. आपल्या आनंदात दुसर्‍यांनाही सामिल करून घेण्यासाठी. सुग्रास अन्न हा आपल्या आनंदाचा भाग असतो.

ज्यांना काही कारणानं पथ्य पाळायचं आहे अशांना पथ्याचं तरी चविष्ट असलेलं खायला मिळालं की मग पथ्य मोडावंसं वाटत नाही. हृदयविकार आटोक्यात राहण्यासाठी करण्याच्या गोष्टींमध्ये योग्य आहाराला महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे तो चविष्ट असावा असा प्रयत्न आपण करायला हवा.

शुभदा गोगटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like also

स्वास्थ्य हेतु लाजवाब मनभावन शरबत

मुनक्कों का शरबत सामग्री ः  15-20 मुनक्का, 1 नींबू, आधा चम्मच शहद, तीन गिलास पानी। विधि ः मुनक्कों को रातभर पानी में भिगोकर रख दें। फिर उनके

स्वास्थ्यवर्धक पेय

छाछ नियमित रूप से छाछ का सेवन करनेवाला व्यक्ति रोग-व्याधियों से मुक्त रहता है। इतना ही नहीं, छाछ सेवन के कारण ठीक हुई व्याधि पुनः